थु ... तुमच्या जींदगाणीवर...!

शुक्रवारचा दिवस तसा आम्हां कामगारांच्या [शिकले - सवरलेले.. अन पाच दिवस काम करणारे विद्वान लोक..!] रोजनिशित फार महत्त्वाचा असतो. अहो म्हणजे आता दोन दिवस मस्त सुट्टी असते .. टेंशन नसते ना... असो..! घरी जाता-जाता सकाळी- पहाटे-पहाटे सिंहगडला जाण्याचा बेत नक्की झाला... सकाळी ४ चा गजर लावुन रात्री लवकरच झोपलो.

........... सकाळी मस्त तयार होवुन गाडीला किक मारली आणि आमची सिंहगडाकडे आगेकूच सुरु झाली... स्वारगेट.. तळ्यातला गणपती... वडगांव... खडकवासला .. अन.. सिंहगड पायथा.. मनात आले आज चालत वरती जावे.. पण सोबत आलेले म्हणाले.. गाडीवरच जाउ.. निघालो... गाडीतळावर गाडी लाउन आम्ही गड पाहु लागलो...

गडावरुन सुर्योदय पाहणे म्हणजे एक पर्वणीच आहे... हळु-हळु वर येणारा तो गोल फारच मोहक दिसतो..थोड्या वेळाने मी म्हटले कल्याण दरवाज्याकडे जाउ.. पण बाकिची मंडळी जरा खाण्याचा बंदोबस्त बघुन येतो म्हटली ...जाता - जाता तानाजी मालुसरेंच्या समाधीलानमस्कार करुन मी एकटाच कल्याण दरवाज्याकडे निघालो.. दरवाज्याच्या आसपास जरा कचरा पडला होता... सिंहगडाला पिकनिकचे ठिकाण समजुन येणा-या आणि कचरा करणा-या त्या महान व्यक्तिंची किव आली ...मनात आले कचरा एका ठिकाणी गोळा करावा... बुरुजाच्या कडेला एका वाळलेल्या झुडुपावर एक पिशवी - प्लास्टीकची बैग - झेंडयाचा आव आणुन फडफडत होती... थोडे पुढे झुकुन मी ती पिशवी काढायचा प्रयत्न करत होतो... तेवढ्यात पाठीमागुनआवाजा आला... " ..सांभाळुन रे गड्या...!" तसेच "हो.." म्हणत मी ती पिशवी काढण्यात विजयी झालो.. पाठीमागे वळालो... तर एक व्यकी शिवकालिन सैनिकाच्या वेशात उभी होती... एवढ्या सकाळी-सकाळी हा कोण असा प्रश्न मनात आला... अन समोरुन उत्तर आले.. "शाब्बास रे बहाद्दरा...!"
डोक्यावर ती सैनिकाची टोपी.. भारदस्त मिशी.. मोठाले कल्ले... अन भारदस्त शरीर.. ढाण्या वाघच जणू..!

" ... आम्ही शिवबाची माणसं ...! .. गडाची जबाबदारी आमची हाय..!" ... मनातुन एक भीतीची लहर क्षणार्धात चमकुन गेली अन.. जाताना आपली छाप माझ्या चेह-यावर टाकुन गेली... त्या सैनिकाच्या ते लक्षात आले...
".. घाबरु नगस...".. उगाचच बहाद्दरपणाचा आव आणत मी समोर उभा राहिलो...
...............
"मी आंदाजीराव... स्वामींचा सैनिक... ब-याच काळात कुणी बोलाय भेटला न्हाय... बसा..."
एका दगडावर जरा टेकत मी थोडा स्थिरावलो..
"आन तुम्ही..? काय करता...?"
".. मी .. सर्जेराव ... कंप्युटर इंजिनियर आहे..."
"हा..असाल - असाल... आम्हाला वाटल.. सैन्यात असाल... "
"गडावर काय करताय..?"
"मला इतिहासाची आवड आहे.. छ.शिवाजी राजे ..त्यांचा इतिहास.. किल्ले हे पाहण्यासाठी मी गडांवर जात असतो..."
"हा.. कोणत्या बाजुने चढलात..."
माझी पंचाईत झाली ... "मी गाडीवर आलो.. त्या समोरच्या रस्त्याने..." घाबरत दिलेले माझे उत्तर..
"एवढा तरणाबांड दिसतो लेका.. चढण करुन यायचे.."
"..."
"... काय दिस आल्यात... आरं गड्या, दिस होते ते आमच्या काळचे... स्वामी शिवबा बरोबरचे... !"
"स्वराज्याच्या संकल्पाने भारावलेले आम्ही मावळे... स्वामींची ती स्वराज्याची हाक... तिच्यासाठी जीव द्यायची आन जीव घ्यायची आमची तयारी... आन तुम्ही लोक... छया...!"

हळु-हळु गडावर लोक जमायला लागले होते... कुणी मित्रांसोबत तर कुणी मैत्रीणीसोबत.. एक आधुनिक जोडी आमच्या दिशेने येत होती. त्यांच्या पाठीमागे काही तरुण मुलांच एक टोळकं...

"... आन ही बगा.. तुमची पीढी .." येणा-या त्या जोडीकडे पहात आंदाजीराव बोलले...
".. हयांचातला गडी कोण आन बाई कोन तेच उमगत न्हाय... आन काय हो.. तुम्हाशिनला कापडाची कमी हाय काय...? ती पोरगी बघा... ईतभर बेंबिच्या खाली आन टिचभर त्याच्या वर... आरं.. लाज - शरम उगाळुन पिला काय तुम्ही लोकं... "
"ते बगा...तिच्या पाठी गोंडा घोळतय ते शिपुर्ड पोरगं ... मिसरुड फुडलं न्हाय आजुन आन हुक्का-बिडीचा नाद... वा रं पट्ट्या.. वा..!"

थोडासा आडोसा बघुन "ती" जोडी एका ठिकाणी जाऊन बसली आणि आपल्या प्रेम लीला करण्यात मग्न झाली...
खरच, लोक किती बदलले आहेत याची कल्पना आली. नकळत माझी मान झुकली होती... डोळे लपण्यासाठी आडोसा शोधत होते..

"... आन ह्यो बहाद्दर बगा..." पाठीमागुन येणा-या त्या टोळक्यातील एकाकडे पहात आंदाजीराव बोलले.
"... वांड्रांच्या टोळक्याचा म्होरक्या दिसतोय... आन ह्यो आसा का झटकतोय... हडळीनं झपाटल्यासारखा..."
".. तो गाणी ऐकतोय.." - मी..
"... ह्याला ते स्वराज्याचे पोवाडे ऐकवा... "

मला स्वतःला पोवाडा ऐकुन बराच काळ लोटला होता... पण शिवशाहीर बाबासाहेबांचे ते पोवाडे.. ती डफली ची थाप अन तो सुर मात्र अजुनही लक्षात आहे... मनात आले... पोवाडा हा प्रकार किती लोकांना माहित असेल...!

सुर्य आणि आंदाजीरावांचा पारा बरोबरीनं वर - वर चढत होता...!

".. स्वामींचं स्वप्न पुरे होताना आम्ही पाहिले... आपलं राज्य.. आपली जनता.... स्वराज्य! .. स्वामींच्या राज्यात असे लोक नव्हतेच... आन अशा लोकांना थारा पन नव्हता....
पन तुमचे हे लोक बगा.. काय शिकले.. काय माहित... ना आय-बा चा आदर ना मोठ्यांचा...
गडावरुन सगळी पुनवडी दिसती.... आन आम्ही बगितली पन...
काय सांगायचे...
......
........
बिनकामी तुमचे ते राखणदार... व्यसनाधिन झालीली तरुणाई ... शरम आन लाज कोळुन पिलेला तो तुमचा आधुनिक आन सुधारलेला समाज... छया... छया...!!
......
........"
स्वामी गेले... संभा गेला... राहिली ती अशी इद्री जनता...
..........
मराठी मातीतली माणसं आम्ही ... जातीसाठी माती खाणारी... स्वराज्याच्या ध्येयानं झपाटलेली..!
.................
....................
बरं झालं... छाताडात घुसलेल्या त्या बाणान एका झटक्यात जीव गेला... स्वराज्यासाठी शहिदाच्या मौतीनं मेलो आम्ही..!
बांडगुळासारखं जगणं आन कुत्र्याच्या मौतीनं मरणं आमच्याशानं जमलं नसत.. थु ... तुमच्या जींदगाणीवर...!
...."

खाडकन डोळे उघडले... नकळत हात चेहरा साफ करायला लागले... सकाळचे ४ वाजले होते.. घडयाळाचा तो गजर बोंब मारत होता.... सिंहगडची एक अद्रुश्य भीती मनात डोकाउन गेली... पण मनानं तयारी केली होती... आज गड चढायचा... स्वामी... संभा ... मालुसरें आणि आन्दाजीरावांना साष्टांग दंडवत घालायचा..!

... काल्पनिक ... पण वस्तुस्थिती हीच आहे... हो ना ..??

...भुंगा!